अहोऽऽऽ!
“अहोऽऽऽ!. काय उच्छाद आहे ह्या माणसाचा.
अहोऽऽऽ!.मी काय म्हणते… काय करताय बाथरूमच्या वर जाऊन. तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? असले माकडचाळे का करता ह्या वयात? रिटायर होउन तुम्हाला २ वर्षे झालीत त्यावरून तरी स्वतःच्या वयाच्या मर्यादा ओळखा”, मालतीबाई.
अहो, “वयाचं सोड गं. मला सांग मी आता खाली कसा उतरु?”
मालतीबाई, “मला आधी सांगा; तुम्ही वर चढलात कसे?”
अहो,”आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी साहेबांनी मदत केली. त्यांनी खालच्या बाजूने टेकू दिला.”
मालतीबाई, “मग बोलवा त्यांना आता. कुठे गायब झाले? हे मुळीक आहेतच फक्त कामापुरते. सेक्रेटरी म्हणे. खरंतर आपल्या सोसायटीच नाव ‘श्री सोसायटी’ नसून ‘सौ सोसायटी’ पाहिजे होतं. सगळ काम बायकाच करतात आणि सोसायटीतले सगळे पुरुष काम वाढवायचं काम करतात. सगळेच कसे हो तुम्ही एकजात अर्धवट?”
मालतीबाईंचा हा संवाद हातामधे पळी घेऊन चालला होता. कमरेला पदर आणि एक छोटा रुमाल खोचलेला, एका हाताला कणीक लागलेली आणि एका हातामधे स्टीलची पळी. वय तसं साठीच पण अगदी तरतरीत. अतिशय कष्टाळू. कायम घरामधे काहीना काही काम चालूच असणार. बाथरूमच्या माळ्यावर मालतीबाईंचे यजमान वामनराव अडकून बसलेले. त्यांच्याकडे पाहत मालतीबाईं त्रागा करीत होत्या.
वामनराव,”अगं खालूनच काय गप्पा मारते. मला खाली घ्यायचं काही तरी कर”
मालतीबाई, “मी सांगितलं का वर चढायला ?. कशासाठी गेला तुम्ही त्या माळ्यावर ?”
वामनराव,”मुळीकांना आपला चौरंग पाहिजे होता. मुळीक होते माझ्याबरोबर पण मी जसा थोडा आत शिरलो तसे ते कुठे गायब झाले कुणास ठाऊक”.
मालतीबाई,”अहो! हॉलमधल्या दिवाणमधल सामान का काढलयं सगळं बाहेर. सगळा पसारा करुन ठेवलाय”
वामनराव,”मला वाटलं चौरंग तू दिवाणमधे ठेवला असशील पण नाही सापडला”
मालतीबाई,”एवढी उलथापालथ करण्यापेक्षा मला काय झाल होतं विचारायला? मीच ठेवलाय तो बाहेर गॅलरीमध्ये”
वामनराव,”बरं बरं. माझी आता मान दुखायला लागली आहे इथे. सरळ बसता येत नाही. कर्णिकांकडून घोडा आण मला इथून उतरायला”
मालतीबाई,”घोडा? त्यांनी कधी घेतला घोडा? तिस-या मजल्यावर कसा आणला असेन त्यांनी?”
वामनराव निर्विकार चेह-याने दोन पायावर मान वाकडी करुन मालतीबाईंकडे बघत होते.
मालतीबाई,”काय पण.. घोडा आण म्हणे. त्या मुळीकांनाच सांगा. ते आणतील तुमच्यासाठी घोडा. तुम्ही नीट सांगितलं ना तर ते गाढवसुध्दा आणतील”
वामनराव,”अगं घोडा म्हणजे मोठा स्टूल. त्यांच्या घरी काम चाललंय रंगाचं तर तो मोठा स्टुल घेऊन ये.”
मालतीबाई,”मी अजिबात घेऊन नाही येणार. तुमचे उद्योग तुम्हीच निस्तरा. वाजले किती बघा. भरपूर काम आहे अजुन मला”
असं म्हणत मालतीबाई स्वतःशी बडबड करीत स्वयंपाक घरात गेल्या. वामनराव तसेच बाथरूमच्या माळ्यावर आपली मान वाकडी करुन बसून राहिले. थोड्यावेळाने मुळीक तो मोठा स्टुल म्हणजेच ‘घोडा’ घेउन बाथरुम पर्यंत आले. त्यांना आणि त्या घोड्याला बघुन वामनरावांना अगदी हायसं वाटलं. वामनराव एकदाचे खाली उतरले.
वामनराव,”कुठे गेला होता तुम्ही सेक्रेटरी साहेब. आमच्या हिने माळ्यावरचं फैलावर घेतलं ना मला. तुम्ही निघा लगेच मी पोहचवतो घोडा नाहीतर तुमच काही खरं नाही”.
मुळीक,”का? काय झालं?
“तुम्ही मला असे वर अडकवून गेला. आता आमच्या मॅडम ह्याच घोड्यावरून तुमची वरात काढतील”
मुळीक,”अहो मालतीबाईंनीच सांगितलं मला घोडा घेऊन यायला. अन मी काही तुम्हाला सोडून नाही गेलो, माझ्या मुलीने आवाज दिला म्हणून बाहेर गेलो पण परत यायला थोडा उशीरच झाला”.
वामनराव,”मुलीवरुन आठवलं. आमची पण मुलगी, नातु आणि जावई येणार आहेत आज. त्याचीच तयारी चाललीये किचनमधे.”
तेवढ्यात मालती बाई एका हातात चौरंग घेऊन आल्या. दोघांनी लगेच आपले बोलणं बंद केले आणि मालतीबाईंकडे खजील नजरेने मनातल्या मनात हसत बघायला लागले.
मालतीबाई,”झाली आजची सर्कस? आणि काय हो मुळीक चौरंग पाहीजे होता तर मला विचारायचं होतं. आमच्या ह्यांच अजिबात लक्ष नसतं. ह्या चौरंगासाठी सगळ घर खाली घेतलयं. सगळा पसारा.”
वामनराव,”अगं ह्यांच्या घरी ब्रम्हकमळ आलंय त्याचीच पुजा आहे. त्यासाठीच लागतोय चौरंग”
मालतीबाई,”बरं. बरं. मुळीकसाहेब तुम्ही हा चौरंग घ्या. आणि हा घोडा सुद्धा कर्णिकांच्या घरी बांधा. हे नाही सोडवायला यायचे. काम आहेत यांना आता.”
मुळीकांना मालतीबाईंच्या बोलण्यातला तुसडेपणा जाणवला. तसा वामनरावांना सुद्धा जाणवला पण त्यांना आता सवय झाली होती. मुळीकांनी चौरंग घेतला आणि म्हणाले,
“होय. होय. मी घेऊन जातो घोडा. पहिला चौरंग पोहचवतो घरी”
मालतीबाई,”आणि हा घोडा केंव्हा नेताय. आमच्या घरात अडगळ नको. आमची वसुधा, शंभु आणि जावई सुद्धा यायचे आहेत आज”
मुळीक्,”लगेच घेऊन जातो वहिनी. नाही ठेवत तुमच्या घरात अडगळ”.
मालतीबाईंनी मुळींकावरची त्रासिक नजर हटवली आणि लगेच आपला मोर्चा वामनरावांकडे वळवला. वामनराव हॉलमधल्या पसा-यतुन वाट शोधत त्यांच्या दिवाणपर्यंत पोहचले. दिवाणावर बसणार तेवढ्यात मालतीबाई त्यांच्यावर खेकसून बोलायला लागल्या.
“आहो….! बसताय काय?”
वामनराव बसणार तेवढ्यातच दचकून उडावे तसे ताठ उभे राहीले. त्यांना बघुन मुळीक हसायला लागले. मालतीबाईनी त्यांच्याकडे पहात कुचकट स्वरात म्हणाल्या.
“तुम्हाला काय झालं हसायला, अहो…. हा पसारा तसाच राहुद्यात. पहिले खाली जाऊन १ लिटर दुध घेऊन या. आणि म्हशीचच दुध आणा मागच्या वेळेसारखे गाईचं दुध घेऊन याल”
मुळीक दोघांच्या मधे उभे राहून हा संवाद ऐकत होते.
वामनराव,”अगं! मागच्या वेळेस तु काय म्हणाली १ लिटर दुधाची पिशवी आणा मी तीच आणली. मला एक कळत नाही तुला कस काय कळत पिशवीतील दुध गाईच आहे की म्हशीचं”
मालतीबाई,”अहो….! नोकरी करायचा ना वो तुम्ही? वाचता येत ना तुम्हाला? लिहितात कि पिशवी वर गाय का म्हैस ते”
वामनराव, “नुसतं लिहीण्याने ठरतं का पिशवीतील दुध कोणाचे ते ?”
मालतीबाई,” तुम्ही उगीचच हुशारी दाखवू नका, देवाने तोंड दिलंय त्या तोंडाने म्हशीचे दुध दुकानात विचारा आणि घेऊन या. तो पर्यंत जेवण लावते मी”
मालतीबाई स्वयंपाक घरात जायला निघाल्या, तेवढ्यात मुळीक्,”चला वामनराव, मला पण दुकानात जायचयं. एकत्र जाऊ”
मालतीबाई,”अहो….! मुळींकांना सांगा, घोडा ज्याचा आहे त्याच्या दारात बांधून या. आपल्या घरात नको”
वामनराव,’हो हो! सांगतो मी. घराची किल्ली दे मला. ओढून घेतो मी दरवाजा”
मालतीबाई रागा-रागाने बाहेर येतात, वामनरावांच्या पुढे उभ्या राहतात. त्यांचा एक हात पकडतात आणि एका हिसक्यात त्यांना बाजूला करतात. वामनराव ज्या दिवाणासमोर उभे असतात त्यावरच घराची किल्ली पडलेली असते. ती उचलून वामनरावांच्या हातात जोराची टाळी मारावी तशी किल्ली ठेवतात.
मालतीबाई,”कधी सुधरणार हा माणुस देवाला माहीत. निष्काळजीपणाचा कळस आहे नुसता”
मालतीबाई परत स्वयंपाकघरात जायला निघतात. वामनराव हसत हसत म्हणतात,
“मी कशाला सुधारायला पाहीजे. तु आहेस ना!”
मालतीबाई आतूनच ओरडून म्हणतात,”हो हो… जा आता लवकर”
मुळीक घोडा घेतात आणि वामनराव चौरंग. दोघे घराच्या बाहेर पडतात. वामनराव दरवाजा जोरात ओढून घेतात तसा दरवाजा लॅच लॉकने बंद होतो. ज्या-त्या वस्तु योग्य ठिकाणी पोहचल्यावर दोघे “श्री सोसायटी”च्या गेटपर्यंत येतात. प्रमुख रस्त्यांच्या फुटपाथवर दोघे माना खाली घालून चालायला सुरुवात करतात. मनात काही तरी विचार करत मुळीक चालत होते. त्यांच्या मनात काहीतरी चालु आहे हे लगेच वामनरावांनी हेरले आणि म्हणाले,
“काय हो ? कसला विचार करताय”
मुळीक्,”काही नाही. तुम्हालाच काही तरी विचारायच होतं. पण विचारु की नको हा प्रश्न पडलाय”
वामनराव,”विचार काय करताय. बोलून टाका काय मनात आहे ते.”
मुळीक, “वामनराव आपण २० वर्ष झाले एकाच सोसायटी मधे राहतोय. तुम्ही तसे वयाने श्रेष्ठ पण आपली मैत्री टिकून आहे. तुमचा संसार जवळून पाहिलाय मी. तुमच्या मुलीचं शिक्षण, लग्न, घरातले आजारपण, सगळं-सगळं.
३० वर्षापेक्षा जास्त तुम्ही महानगरपालिकेत नोकरी केली. तुमच्या वागण्यात आणि स्वभावात कधीच बदल झालेला दिसला नाही. सोसायटीतली प्रत्येक व्यक्ती, अगदी लहान मुले सुद्धा तुम्हाला एक सरळ, साधा आणि सज्जन माणूस म्हणूनच पाहत आहे. पण एक शेजारी म्हणून मला नेहमी एका गोष्टीच वाईट वाटतं. वहिनी जरा तुमच्या बाबतीत जास्तच कडक आहेत. सगळ्या सोसायटीमध्ये सुद्धा तसाच गवगवा आहे. राग मानून नका घेऊ पण त्या आहेत शीघ्रकोपी; सारख्या भांडत असतात. रोजचा जो भाजीवाला आपल्या सोसायटीमध्ये येतो त्याच्याशी त्या कमीत-कमी अर्धा तास रोज भांडतात त्यांची खरेदी झाल्यावरच सोसायटीच्या बाकीच्या बायका भाजी घेतात त्याच्याकडून.”
वामनराव,”हा हा हा..! भाजीवाल्याचा गोंधळ माहीती आहे मला.. ते तर रोजच आहे”
मुळीक,” तुम्ही तर राव हसण्यावारी घेताय, फक्त भाजीवालाच काय, सगळ्यांशी भांडत असतात त्या. आपण संध्याकाळचे खाली बाकावर बसलेलो असतो तिथेसुद्धा ‘अहोऽऽऽ !’ असा आवाज आला की आम्ही सगळे समजतो की तुम्हाला बोलावणं आलं. त्यांचा आवाज आला की आम्हीच सगळे तुम्हाला जबरदस्तीने[ घरी पाठवतो. तुम्ही पटकन घरी नाही गेलात तर तुमचा आमच्यासमोरच पाणउतारा होईल याची आम्हालाच भीती वाटत असते.”
वामनराव,”कसं आहे मुळीक, आमच्या हिचं काम सगळ वेळेवर असतं. मी खाली बसलो की मला कधीच किती वाजले हे लक्षात येत नाही, जेवणाची वेळ चुकायला नको म्हणुन ती आवाज देत असते”
मुळीक,”हो पण प्रत्येक पाच मिनीटाला अहो-अहो करायची गरज आहे का? तुम्हाला सांगतो सोसायटीतल्या मुलांनी सुद्धा तुम्हाला “अहो” अस नाव ठेवलय. वाईट वाटतं हो. कसे काय सहन करता तुम्ही सगळं. एक तर तुम्ही अतिशय भोळे आहात. आम्हाला तर असं वाटत वहिनींच्या कायम अवहेलना करण्यामुळे तुमचा असा स्वभाव झालाय”
वामनराव,”बघितला आमच्या हिचा प्रभाव, मला ‘अहो’ नाव ठेवलय लोकांनी. आवडेल मला त्यांनी अहो नावाने बोलावलं तर. मला खरंतर खुप बर वाटलं आज. तुम्ही लोक खुप लक्ष ठेवता माझ्यावर.”
मुळीक,”राग आला का तुम्हाला ? पण आयुष्यभर तुम्ही नोकरी केली. आता रिटायरमेंट नंतर तरी तुम्हाला मोकळीक दिली पाहीजे तुमच्या बायकोने. समाजात बायकोचा एवढा अहमपणा चांगला दिसत नाही वामनराव. लोक काही बोलतात मग”
वामनराव,”बायकोच्या ताटाखालचे मांजर, येडा, भेकड, बायकोचा गुलाम असं काही म्हणतील. मला नाही फरक पडत
काही. विषय काढला म्हणून सांगतो. तुम्ही ते भाजीवाल्याचं भांडणाचं प्रकरण सांगितलं पण त्या मागची वस्तुस्थिती
नक्की काय आहे ते तुम्हाला माहीत नाही बहुतेक. एक तर आम्हाला एकच मुलगी, एकच अपत्य असायला कारण
सुद्धा आमची परिस्थिती. नसतं जमलं तोटक्या पगारात अजून एक तोंड सांभाळणं. एकाच मुलीच सगळं व्यवस्थित केलं आणि मार्गी लावलं. माझी महानगरपालिकेतील नोकरी; लोकांना वाटत वरकमाईही भरपूर असेल पण ते माझ्या स्वभावात नाही आणि माझ्या कुटुंबानेही पगारापेक्षा जास्त मागणी केली नाही. जसं आहे तसं काटकसरीमधे जगलो. तुम्हाला वाटत माझी बायको भाजीवाल्याबरोबर भांडते त्याच्याहून पुढचं मी सांगेन ती सगळ्यांबरोबर भांडते. म्हणजे कापडाच्या दुकानदाराबरोबर्, दूधवाल्याशी, आमच्या वाण्याबरोबर, अगदी सगळ्यांशीच. ह्याच्या मागचं खरं कारण म्हणजे भाव करणे. कमीत कमी किमतीमध्ये तिला वस्तू हव्या असतात हा तिच्या काटकसरीपणाचा परिणाम आणि आमच्या संसाराची गरज आहे. सोसायटीतल्या बायका आमच्या हिने भाजी घेतली की मग भाजी घेतात; पण एक लक्षात घ्या मुळीक, तीने ज्या कमी भावात भाजी घेतली त्याच कमी भावात सगळ्या बायका भाजी घेतात. लोक फक्त तिच्या भांडणाच उदाहरण देतात पण तिच्यामुळे झालेल्या फायद्याचं कोणीच बोलत नाही. लोकांना फक्त तोंड दिसतं हो”
मुळीक,”माफ करा वामनराव. मला वाटत मी फारच खासगी बोललो. खरं आहे माझ्या लक्षात भाजीवाल्याची गोष्ट आली नाही. खरच मी खुपचं चुकीचं बोललो तुमच्याशी”
वामनराव,”चुकीच काय त्यात. मित्र तुम्ही आमचे. तुम्ही विषय काढला म्हणून मला माझ्या बायकोबद्दल कोणाशी बोलता तरी येतय”
मुळीक,”मला वाटल तुम्ही दुखावले गेलात. आम्हाला नेहमी वाटतं की वहिनी तुम्हाला नव-यासारखी वागणूक देत नाहीत”
वामनराव,”काही अर्थाने बरोबर आहे ते सुद्धा. समाजात बायकोने नव-याला नव-यासारखी वागणूक द्यायची म्हणजे तो म्हणेल तसं बायकोने वागायचं. आमच्या बाबतीत शक्यतो ती म्हणेल तसा मी वागतो. तुम्हीच म्हणाला आत्ता की मी फार भोळा आहे वगैरे. खरं सांगू थोडा भोळसरच आहे मी पण आणि विसरभोळा सुद्धा. १० वर्षापासून मधुमेहाचं दुखणं मागे लागलं. तिला डॉक्टरांनी सांगीतलं जेवण वगैरे ह्या गोष्टी वेळच्यावेळी केलं आणि काही पथ्य पाळली की शरीरातली साखर वाढत नाही अगदी ठणठणीत राहते तब्बेत. तेंव्हापासून घडीघडीला ‘अहो’चा पाढा चालू झाला हिचा. जेवणाचा टाईम झाला की लगेच कावरीबावरी होते. मी जिथे असेल तिथून मला बोलावून घेते आणि जेवायला सांगते. आपण बाकावर संध्याकाळचं बसतो तेंव्हा ती मला रोज आवाज देत असते. मी लगेच गेलो नाही की मग ती स्वतः खाली येऊन मला घेऊन जाते. पण लोकांना वाटत की माझी बायको मला अजिबात मोकळीक देत नाही. तुम्हाला सांगतो मुळीक आमच्या हिला दिवसातून कमीत कमी ४ वेळा चहा लागायचा. १० वर्ष होऊन गेले हिने माझ्यासाठी चहासुद्धा सोडून दिला. हात लावला नाही चहाच्या कपाला.”
मुळीक,”काय सांगता वामनराव? तुम्ही तर डोळेच उघडले माझे. माफ करा वामनराव काही चुकून बोललो असेल तर”.
वामनराव,”माफी काय मागता मुळीक; मी सुद्धा मान्य करतोच की माझी बायको शीघ्रकोपी आहे ते. लगेच भडकते पण तिच्या प्रत्येक बोलण्यामागे माझी किंवा संसाराची काळजी असते. खुप भीती वाटते हो तिला प्रत्येक गोष्टीची, खुप काळजी करते सगळ्यांची. तिचं सारखं ‘अहो-अहो’ करण्यामध्ये लोकांना तिचा संताप दिसतो पण खरंतर ती खुप जास्त काळजी करते माझी. म्हणून सारखं ‘अहो-अहो’. तुम्हाला हसायला येईल पण जेंव्हा आमच्या वसुधाला दिवस गेले होते तेंव्हा एवढी बावरून गेली होती ही. रात्र-रात्र बसून तिची काळजी घेत होती. अचानक रात्रीची उठून वसुधाला गोंजारत बसायची. जेंव्हा वसुधाला इस्पितळात डिलिव्हरीसाठी घेऊन गेलो तेंव्हा वसुधापेक्षा हिचं जास्त रडत होती. माझ्या नातवाची तर एवढी देखभाल केली की एखादी आई स्वतःच्या मुलाची काळजी घ्यायची नाही. अक्षरशः झोपत नसायची. मला तर वाटायचं वसुधा नाही पण माझी बायकोच परत बाळंतीण झालीये.”
मुळीक,”खरच गोड आहे तुमचा शंभू. वसुधा सुद्धा अगदी हुशार. वहिनींनी तिच्यासाठी केलेली पळा-पळ पण पाहीली आम्ही सगळ्यांनी.”
वामनराव,”जावई सुद्धा चांगला भेटलाय आम्हाला. बाळंतपणाचा सगळा खर्च आम्हाला दिला त्यांनी. वसुधाला कसलाही त्रास नाही. येत असते घरी वरचेवर. घरी आल्यावर दोघी मायलेकी माझ्या विसरभोळ्या स्वभावाची चेष्टा करत बसतात. खुष असतात. तसा आहे मी विसरभोळा. मी कामावर जाताना सारखा डबा विसरायचो. मग ही घेऊन यायची डबा ऑफीसमध्ये. डबा आला की मी तिला ऑफीसच्या समोरच्या दुकानात घेऊन जात असे. कुल्फी फार आवडते तिला. त्या दुकानातली कुल्फी सुद्धा फेमस होती. कुल्फी खाऊन झाली की मी कामावर आणि बाईसाहेब घरी. गंमत काय आहे; मीच मुद्दामहून विसरायचो डब्बा. त्या निमित्ताने का होईना तिला कुल्फी द्यायचा योग यायचा. तेवढच रोमँटिक फिल का काय म्हणतात ते. नाहीतर बाईसाहेब स्वतःसाठी खर्च अजिबात करत नाहीत.”
वामनराव, मुळीक बोलत-बोलत केंव्हाच दुधाच्या दुकानापर्यंत आले होते. पण तिथेच कोप-यावर बोलत उभे राहीले होते. समोरून फुटपाथवरून मालतीबाई अर्थात वामनरावांच्या म्हणजेच अहोंच्या पत्नी चालत येतांना दिसल्या.
मुळीक,”वामनराव, आपली बहुतेक या रोडवरचं धिंड निघणार बहुतेक”
वामनराव,”का हो? काय झालं अचानक”
मुळीक, “समोर बघा! वहिनी चालत येत आहेत.”
वामनराव,”उशीरच झाला हो आपल्याला. आता आहे रस्त्यावरच सुरुवात”
मालतीबाई रुक्मीणीसारख्या कंबरेवर हात ठेऊन उभ्या राहिल्या. चेह-यावर राग दिसतच होता.
वामनराव,”अगं तु कशाला आलीस? मी येतच होतो.”
मालतीबाई,”येतच होता? कुठाय दुध? घेतलं का ? “
वामनराव,”हे काय घेतच होतो”
मालतीबाई,” बरं बरं ! घ्या दुध”
वामनराव दुध घ्यायला दुकानामधे जातात. तोपर्यंत मुळीक मालतीबाईंशी गप्पा मारत उभे राहतात.
वामनराव दुध न घेताच दुकानातून बाहेर येतात.
वामनराव,”मुळीकसाहेब पैसे आहेत का हो तुमच्याकडे आत्ता ?”
मुळीक,”आहेत की? का हो काय झालं?”
मालतीबाई,”काही नाही झालं, ह्या माणसाचं फक्त वय वाढलंय. वयाबरोबर वेंधळेपणासुध्दा… घरातून पैसे न घेताच दुध आणायला निघालेत महाशय. हे घ्या पैसे. तेवढ्यासाठीच आलेय मी”
वामनराव आणि मुळीक एकमेकाकडे पाहतात आणि हसतात. वामनराव पैसे घेऊन जातात आणि दुध घेऊन येतात. ते सुद्धा म्हशीचं.
वामनराव,”चला, जाऊ घरी”
मालतीबाई,”मी वसुधाकडे जातेय. शंभुला आणि तिला घेऊन येतेय. तुमचं जेवण काढून ठेवलय ते खा लगेच. किल्ली आहे एक माझ्याकडे. येतेच मी. गेल्या गेल्या फ्रीजमधे दुध ठेऊन द्या आणि हो… झोपू नका. तुम्ही घातलेला पसारा मी आवरलाय सगळा. तरी काही राहीलं असेल तर आवरून ठेवा. जावईसुद्धा यायचेत संध्याकाळी.”
वामनराव,”बरं बरं… ये जाऊन तु. मी करतो सगळं व्यवस्थित. चला मुळीकसाहेब.. तुम्हीपण जा पुढे तुमच्या कामाला. मी जातो घरी. नाहीतर तुम्हाला माहीत आहे आमची जेवायची वेळ चुकायची”
मुळीक,”मी पण येतो तुमच्या बरोबर घराकडे. माझं काम करेल संध्याकाळी”
मालतीबाई निघून जातात आणि ही मित्रांची जोड पुन्हा ‘श्री सोसायटीची’ रस्ता पकडते.
मुळीक,”वामनराव, मानलं राव आपण तुमच्या विसरभोळ्या स्वभावाला आणि मालतीबाईंना”
वामनराव,”आला म्हणजे तुम्हालासुद्धा प्रत्यय. अहो हे तर काहीच नाही. मला मधुमेह आहे म्हणून बाईसाहेंबानी माझ्यासाठी बुट आणले. मला काही बुट घालायची सवय नाही. मी नेहमी विसरतो बुट घालायला आणि चप्पल घालून बाहेर पडतो. बाईसाहेबांच्या जेंव्हा लक्षात येईल; तेंव्हा त्या हातात बुट घेऊन मी जिथे असेल तेथे येतात.. मला बुट घालायला लावतात आणि ती चप्पल हातात घेऊन घरी जातात. मग मी कुठे का असेना, ऑफीस,बस स्टँड, पाहुण्यांच्या घरात. कुठेही हजर असायची बुट घेऊन. मग मीच सवय लावून घेतली बुटाची, फार त्रास व्हायचा तिला”
दोघे बोलत बोलत सोसायटी पर्यंत पोहचले. मुळीक आणि वामनराव आपापल्या घरी गेले.
वामनरावांनी दरवाजा लावून घेतला. जेवणाच्या ताटाकडे बघितलं. दमल्यासारखे झाले म्हणून थोडावेळ शांत होउन बसले. लगेच उठून सा-या घराची आवराआवर केली. झाडून घेतले सारं घर. सगळं घर साफ केलं. नातु येणार म्हणून काचेच्या वस्तु कपाटाच्यावर ठेऊन दिल्या. वामनरावांना कामामुळे चांगलाच दम लागला होता. हॉलमधल्या दिवाणवर अंग टाकून दिले. मुळीकांबरोबर बायकोबद्दल केलेल्या गप्पा आठवत छताकडे बघत पडून राहिले.
वामनराव पहिल्यांदाच आपल्या बायकोबद्दल एवढे बोलले होते. काय सांगू? किती सांगू ? अशी त्यांची अवस्था झाली होती. पलंगावर पडल्या-पडल्या वामनराव डोळ्यासमोर २०-२५ वर्षाच्या संसाराचा रीळ फिरवत होते. लोकांना वाटणारा एक हुकमी संसार प्रत्यक्षात किती वेगळा होता. त्यांना वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत होत ते म्हणजे, मालतीबाईंबद्दल लोकांचं असलेले चुकीच मत. मालतीबाइंच असं हेकेखोर वागणं, त्रागा करणं हे फक्त होतं ते प्रेमासाठी. आपल्या नव-याच्या काळजीपोटी मालतीबाईंनी स्वत:च्या अस्तित्वाला कधीच तिलांजली दिली होती. आपला असं त्रागा करून वागण म्हणजे लोकांच्या मनात आपल वाईट मत बनवणं हा विचार आणि ह्या गोष्टीची काळजी मालतीबाई कधीच करत नव्हत्या. आणि ह्याच सामाजिक, वैयक्तिक त्यागाचे अप्रूप आज वामनरावांना वाटत होते. मुळीकांनी वामनरावांच्या मनातली तार छेडली होती. त्यांच्या मनातील सप्तकाने चांगलाच सूर धरला होता. बायकोसमोर आपलं प्रेम व्यक्त करता येणार नाही एवढा भिडस्त स्वभाव वामनरावांचा आणि तेवढाच काटेकोर स्वभाव मालतीबाईंचा. तरुण वयात पहिलं प्रेम झाल्यावर जसे भाव प्रकट व्हावेत तसंच वामनरावांना झाले होते. आपल्या बायकोच्या अपार प्रेमाने आणि तीची सोसायटीमधे होत असलेल्या कुचंबणेमुळे वामनरांवांचे ऊर अतिप्रचंड भावनेने भरून आले. आलेला हुंदका गिळून वामनरावांनी डोळे मिटले आणि काही क्षणातच त्याच मिटलेल्या डोळ्यातून अश्रु वाहु लागले. वामनराव आपल्या बंद नजरेमध्ये काय पहात होते म्हणूनच ही उत्कटता डोळ्यांमधून बाहेर आली असावी? हे वामनरावांनाच माहीत असावं. वामनराव प्रेमळ आठवणींच स्वप्न पहात तसेच झोपी गेले.
वामनरावांना चांगलीच झोप लागली. दोन-तीन तास होऊन गेले तरी न जेवताच वामनराव झोपून गेले होते. त्यांना जाग येत होती ती एका आवाजामुळे. त्यांच्या कानावर “अहो” “अहो” असं अस्पष्ट आवाज येत होता. त्यांच्या खांद्याला गदागदा हलवून कोणीतरी उठवायचा प्रयत्न करत होते. वामनराव जागे झाले. तेंव्हा त्यांना आवाज येत होता,
“अहो बाबा. ओ बाबा, अहो उठा की. दुपारचे काय झोपलाय”
वामनराव ताडकन उठून बसतात आणि त्या आवाजाकडे पहातात. ती होती त्यांची मुलगी ‘वसुधा’
वामनराव,” अगं कसा काय डोळा लागला दुपारचा आज कळलच नाही”
वसुधा,”केंव्हाच उठवतेय मी. तरी बरं घराची एक किल्ली माझ्याकडे आहे ते, नाहीतर दरवाजाच तोडावा लागला असता”
वसुधा तिथेच ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतील पाणी पिते. वामनरावांची नजर इकडे-तिकडे भिरभिरत होती. काही तरी शोधत होते ते.
वामनराव,”वसु अगं शंभु नाही आला का वर अजुन. आणि ही कुठे गेलीये. हं! आज्जी आणि नातु खाली सोसायटीच्या बागेत खेळत बसले असतील. तुला सांगतो वसु, मालती अक्षरशः लहान मुलासारखी खेळत असते शंभु बरोबर. सगळी सोसायटी ह्या दोघांची गंमत बघत असते. ही पण अशी आहे ना तुला घेऊन येते म्हणाली आणि तीन तास झाले तरी तुम्ही आला नाहीत मला लागली झोप. आता किती गोंधळ होणार आहे ह्या झोपेवरुन. माझी जेवणाची वेळ चुकलेलीच आहे, त्यात गोळ्या खायची सुद्धा. तू पटकन जेवणाचं ताट नाहीसं कर बघु. तिला कळलच नाही पाहिजे मी जेवण केलं नाही म्हणून. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते ?”
वसुधा स्तब्ध होऊन वामनरावांकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अश्रुच तळं झालं होतं. तारा तुटावा तसा आसवाचा थेंब डोळ्यातुन खाली टपकला. बापाकडे बघत वसुधा आपले अश्रु आवरण्याचा प्रयत्न करत होती.
वामनरावांच्या लक्षात येतं, काहीतरी बिनसलंय. ते उभे राहतात आणि विचारतात,”काय झालं वसु?”
स्वत:च्या वडिलांच्या या प्रश्नाने वसु स्तब्ध झाली. खुप मोठं दु:खाचं वादळ तिच्या मनामधे तयार झाले होते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वसु कडे होते पण त्यासाठी शब्द बाहेर पडत नव्हते. शब्द बाहेर पडतीलच कसे, मनात वादळच असं तयार झालं होतं की त्यातून फक्त अश्रुच वाट करु शकत होते. अश्रुनी वाट मोकळी केली आणि तीच दु:ख तेवढ्याच प्रखरतेने अश्रुंवाटॆ वाहु लागलं. वसु रडत होती. वामनराव कावरेबावरे होऊन तिच्याकडे पहात होते. एखाद लहानगं बाळ जसे निर्विकार चेह-याने अश्या प्रसंगात सगळ्यांकडे ज्या नजरेने पाहत, त्याच भाबड्या नजरेने वामनराव आपल्या लेकीकडे पाहत होते. त्यांना कोणत्याच गोष्टीची कल्पना येत नव्हती. त्यांच्या या निरागस मुद्रेकडे बघुन वसु अजूनच त्रस्त झाली होती.
वामनराव तिला पुन्हा विचारु लागले “काय झालय वसु ? शंभू बरा आहे ना ? का केलीस भांडण नव-याबरोबर”, वामनराव
वसु मात्र अनुत्तरीतच होती. स्वतःचा तोल जाईल या भीतीने ती भिंतीला टेकून उभी राहिली.
वामनराव पलंगावर सावरून बसले. आपल्या लेकीचा असा भेदरलेला आणि रडवेला चेहरा पहाताना त्यांच्या मनात शंका आली.”अगं काय झालं ते तरी सांग. सगळेच प्रश्न तुझ्या आईनेच सोडवावेत असा हट्ट करु नकोस. मला सांग काय झालय ते. तुझ्या आईला अजिबात सांगु नकोस. खूप सोसते ग ती. आता जास्त टेंशन नको तीला “
वामनराव उठतात आणि आपल्या लेकीच्या समोर जाऊन ऊभे राहतात. लेकीच्या डोक्यावरून मायने हात फिरवतात आणि तीला जवळ घेऊन तीच रडणं थांबवायचा प्रयत्न करतात. वामनराव लेकीची अशी अवस्था बघून गलबलून जातात तीला धीर देत म्हणतात,”असं रडत का कोणी? हं? वेडाबाई. आम्ही आहोत ना अजुन. सांग बरे काय झालय ते.. तुझी आई आली ना घरामधे आण तुझी अशी अवस्था बघून सगळ घर डोक्यावर घेईल आणि मग मला फैलावर घेईल..सांग काय झालं ते. मी बघतो तुझा सगळा प्रॉब्लेम” वामनराव लेकीला जवळ घेऊन बोलत असतात.
वसु मात्र अजूनही रडायची थांबली नव्हती. वामनराव थोड्या मोठ्या स्वरात बोलायला सुरुवात करतात.
“अगं बोल वसु, का तुझी आई आल्यावरच बोलणार आहेस ?”
विजेच्या वेगाने वसु पित्याच्या मिठीतून बाहेर येते. आपल्या भरलेल्या डोळ्याने पित्याकडे रागाने बघते. वामनरावांच्या दंडाला दोन्ही हाताने करकचून पकडते आणि वामनरावांना आपल्या पूर्ण ताकदीने ओढत स्वयंपाक घरात आणते आणि स्वयंपाकघरातल्या देव्हा-यासमोर वामनरावांना ऊभे करते. वामनराव देव्हा-याकडे पाहतात आणि देव्हा-याच्या वर असलेल्या मोठ्या फोटोकडे सुद्धा.
वसुचा श्वास मोठ्याने चालु होता. तिला दम लागला होता. त्याच आवेशाने वसु मोठ्याने बोलायला सुरुवात करते.
“अहो…… बाबा…. आई जाऊन तीन महीने झाले की हो . तुम्ही अजुन असे का वागता “
वसु आपले अश्रु आवरत वेगाने वामनरावांना त्या फोटो समोर सोडून घराच्या बाहेर वेगाने निघून जाते.
स्वयंपाक घरात भल्या मोठ्या मालतीबाईंच्या तसबिरीकडे वामनराव पहात होते. प्रचंड शांतता घरामधे पसरली होती. वामनराव स्तब्ध झाले होते. मालतीबाईचा फोटोकडे आणि त्यांच्या कपाळावरील ठसठशीत कुंकवाकडे वामनराव पहात होते. ख-या अर्थाने एकटीनेच केलेला दोघांचा संसार मालतीबाई शेवटाच्या जवळ आल्यावर वामनरावांना सोडून गेल्या होत्या. दोघे तसे शरीराने वेगळे होते मात्र आत्म्याने मात्र एकच. मालतीबाई लोकांसाठी निघून गेल्या असतील पण वामनरावांसाठी नाही. वामनराव तीन महिने होऊन गेले तरी मालतीबाईंच्या सान्निध्यात, मालतीबाईंच्या संसारात रमत होते. मालतीबाईंचा म्रृत्यू ही वस्तुस्थिती वामनराव मान्य करत नव्हते. करतील तरी कसे. वामनराव आणि मालतीबाई हे एकच. मालतीबाईंना वामनरांवाच्यातुन काढले तर वामनराव उरतच नाहीत. वामनराव तसबिरीकडे पाहून हसू लागले आणि फोटो बरोबरच बोलू लागले.
“काय गं? हा फोटो तु वसुच्या लग्नात काढला होता नाही. छान नटली होती तु. आपणच सगळं काम करत होतो लग्नामध्ये. आपण म्हणजे तुच फक्त मी म्हणजे तुझ्या भाषेत ‘काम वाढवून ठेवायचं काम’. हा हा हा. किती लक्ष ठेवायचीस माझ्यावर तू लग्नामध्ये सुद्धा. अजिबात थकली नव्हतीस. लग्नाचा पसारा उरकल्यावर मीच तुझ्या हौसेखातर हा फोटो त्या फोटोग्राफरला काढायला लावला होता. अजिबात थकवा दिसत नाही तुझ्या चेह-यावर”
वामनराव ओट्यावरच वसुने काढून ठेवलेलं जेवणाचं ताट उचलतात आणि तिथेच स्टुल घेवून टेबलावर जेवायला सुरुवात करतात. पुन्हा फोटोकडे बघुन वामनराव बोलतात.
“मला माहीत आहे. तुला काय वाटलं..? तु घरात नसलीस म्हणजे मी जेवणाची, औषधाची वेळ चुकवेन? छे! छे! शक्यच नाही. तुच बघ सगळं कसं तुझ्या वेळापत्रकाप्रमाणे चाललय. सवयच लागली आहे गं मालती मला. “
“तुला सांगतो मालती काल शंभु मला तुझी भीती दाखवत होता. म्हणे मला खेळायला घेऊन चला नाहीतर मी आज्जीला तुमच नाव सांगेन. मी मनातली मनात हसत होतो. “
वामनराव नुसतेच जेवणाच्या ताटावर बसले होते. संध्याकाळ झाली होती. स्वयंपाकघरात अंधार झाला होता. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. जेवण तसंच समोर राहीलं होतं, चालु होता तो फक्त वामनरावांचा मालतीबाईंशी संवाद. बहुतेक मालतीबाई सुद्धा त्यांना “अहो….!” असा प्रतिसाद देत असतील.
(समाप्त)
____मनस्वी राजन
आज सकाळी सोसायटीतल्या मन्या केसांना जेल लाऊण,गाडी चका-चक धुऊन,बुट-कट आणि फ़ंकी शर्ट घालून गाडीवर बसला ते कॉलेजला जायला. जात असताना त्याचि आई म्हणालीच “आज सुद्धा कॉलेजला चालला आहेस तर एखादी वही सुद्धा घेऊन जा”. तेवढ्यात पलीकडच्या विंग मधली “मिस.सोसायटी” पांढरा फ़ट्ट् ड्रेस आणि हाय हिल पायात घालून टक-टक आवाज करत ऊतरली.. आज ऑफिसला ति रिक्षाने चालली होति. तिच्या पाठोपाठ खुप सारे होणारे आणि असणारे प्रेमवीर आपआपल्या परीने सजुन-सावरून ईछीत आणि निच्छीत कर्म स्थळी निघाले होते.१२वीच्या Maths च्या क्लासला जाणा-या अथर्वच्या खिशात सुद्धा कसल्या-कसल्या रंगाचे गंडे-दोरे आणि छोटे-छोटे भेटकार्ड होती. कारण आजची तारीख होती ति १४ फेब्रुवारी. म्हणजेच ’व्हॅलेंटाईन डे’. हा प्रेम करणा-या आणि प्रेम व्यक्त करणा-यांचा सण किंवा दिवस असतो. ह्याला भारतीय शास्त्रांनुसार पंचांग,तिथीच्या आकडेवारी मधे काडीचे सुद्धा स्थान नाही.



मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ! ५६०० लेख, १६०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ !